‘गावे सुखी आणि समृद्ध झाली तरच देश समृद्ध होऊ शकतो’ या भूमिकेशी बांधील राहून, ‘गावाकडे चला’ या महात्मा गांधींच्या संदेशातून प्रेरणा घेऊन १५ ऑगस्ट १९८३ रोजी लातूरमधील अहमदपूरमध्ये ‘ग्रामीण विकास लोकसंस्था’ या संस्थेची स्थापना झाली. राहायला जमीन नसणाऱ्या, गरीब आणि वंचित लोकांसाठी ही संस्था गेली ३४ वर्षे काम करत आहे. ‘लेणे समाजाचे’ सदरात आज घेऊ या संस्थेची थोडक्यात माहिती.....................
पूर्वी हैदराबाद संस्थानच्या निजामाच्या आधिपत्याखाली असलेला आणि नंतर ब्रिटिशांची राजवट असणारा मराठवाडा विभाग कायमच उपेक्षित आणि काहीसा दुर्लक्षित राहत आला आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मराठवाड्यातील जिल्हे आणि तेथील गावे विकासाच्या बाबतीत वंचित आणि मागासलेली राहिली. गरिबी आणि हातात हात घालून येणाऱ्या निरक्षरतेमुळे इथल्या लोकांना माणूस म्हणून जगणे आणि ताठ मानेने उभे राहणेसुद्धा कठीण झाले.
त्यामुळे अशा गावोगावच्या लोकांना आपल्या पायांवर उभे करण्यासाठी, ‘गावाकडे चला’ या महात्मा गांधींच्या संदेशातून प्रेरणा घेऊन १५ ऑगस्ट १९८३ रोजी लातूरमधील अहमदपूरमध्ये ‘ग्रामीण विकास लोकसंस्था’ (People’s Institute of Rural Development) या संस्थेची स्थापना झाली. राहायला जमीन नसणाऱ्या, गरीब आणि वंचित लोकांसाठी ही संस्था गेली ३४ वर्षे काम करत आहे. संस्थेने सध्या पाच महत्त्वाची कार्ये हाती घेतली आहेत. ती अशी -
- एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम आणि त्यासंबंधी प्रशिक्षण : आतापावेतो एकूण १२ गावांच्या शिवारात पाच हजार हेक्टर क्षेत्रावर एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम राबवून, वाहून जाणाऱ्या मातीचे संरक्षण करण्यात आले आहे. यामुळे सर्व गावांत बारमाही रोजगार उपलब्ध झाला आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य संपून मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. सिंचनाचे क्षेत्र तयार झाल्याने मजुरांचे हंगामी स्थलांतर थांबले आहे.
- हवामानबदल स्वीकृतीकरण कार्यक्रम : काळाची गरज ओळखून या कार्यक्रमात सहभाग वाढवण्यात आला आहे.
- बालिका विवाह प्रतिबंध कार्यक्रम : हा कार्यक्रम राबवल्यापासून बालिकांच्या विवाहाचे प्रमाण ५८ टक्क्यांवरून ३० टक्क्यांवर आले आहे. तरीही अजून बराच पल्ला गाठायचा आहे.
- बालमजुरी निर्मूलन : बालकामगार हा शब्दप्रयोग करून या संदर्भात काम करणारी कदाचित ‘ग्रामीण विकास लोकसंस्था’ ही पहिलीच संस्था असावी. जागृती, साक्षरता आणि प्रबोधनावर भर देऊन या बाबतीत संस्थेने ठोस पावले उचलली आहेत. परिणामी पाच हजारपेक्षा जास्त मुलांचे प्रबोधन केल्यावर एक हजारहून अधिक मुलांनी पुन्हा शाळेत प्रवेश घेतला आहे. मराठवाड्यातील २४ तालुक्यांमधील दीड लाख लोकांपर्यंत हे अभियान पोहोचवण्यात आले आहे.
- महिला सक्षमीकरण : जवळपास ३७ वर्षांपूर्वी अहमदपूर तालुक्यात स्त्रीमुक्तीची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. स्त्रीमुक्तीसाठी सातत्याने प्रबोधन मेळावे आणि सभा घेतल्या जात आहेत. बचत गट चळवळ सुरू करण्यात आली आहे. पीडित परित्यक्ता स्त्रियांना कायदेशीर सल्ल्यांचा लाभ देण्यात येतो.
याव्यतिरिक्त स्त्री-पुरुष समभाव वाढावा आणि स्त्रियांवरचे अत्याचार, बलात्कार थांबावेत यासाठी संस्थेतर्फे शाळा, कॉलेजेस आणि गाव स्तरावर प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि शिबिरे आयोजित करण्यात येतात.
संस्थेचे आगामी उपक्रम :- सुटका केलेल्या बालमजुरांचे पुनर्वसन : यासाठी त्यांच्या राहण्याची सोय, तसेच त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना काही तंत्रशिक्षण मिळण्याची सोय संस्था करणार आहे.
- बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र : आजपर्यंतच्या ३० वर्षांच्या अनुभवातून कोणत्या प्रकारचे शिक्षण आणि तंत्रशिक्षण वंचितांच्या उपयोगाचे ठरेल ते निश्चित करून, त्या त्या प्रकारचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था एकाच छत्राखाली होऊ शकेल अशा स्वरूपाचे केंद्र असावे या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत.
- चळवळ आणि कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून मदत मिळावी यासाठी संस्थेतर्फे फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियाचाही वापर करण्यात येत आहे.
विविध कार्यक्रमांशी संबंधित रिपोर्ट तयार करणे, कागदपत्रांचा मराठीतून इंग्लिशमध्ये अनुवादत करणे, सीएसआर/ डोनर एजन्सीशी संपर्क साधणे, अशा कामांसाठी संस्थेला स्वयंसेवकांची आवश्यकता आहे. त्यासाठी इच्छुकांनी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क : मच्छिंद्र गोजमे, ग्रामीण विकास लोकसंस्था, लातूर
ई-मेल : president.pird@gmail.com
मोबाइल : ९४२३० ७७८४८
वेबसाइट :
https://sites.google.com/site/pirdlatur/
(‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध होतील.)